नियती
आपण फार ढोंगी असतो.. जगाशी खोटं बोलायच्या नादात स्वतःशीही खोटं बोलणं सुरु करतो.. अजून चांगल्याच्या नादात खूप चांगलं ही गमावून बसतो आणि मग त्याचा आरोप मात्र आपल्याला स्वतः घ्यायला नको असतो.. मग नियतीचा खेळ सगळा म्हणत पुढे जातो.. आयुष्यातल्या महत्त्वाच्या वळणांवर जेव्हा काहीतरी निर्णय घ्यायचे असतात तेव्हा नेमकं आपल्याला नियतीची आठवण होते मग आपण म्हणतो.. मी याबद्दल काही विचार केलेला नाही बघू नियतीच्या मनात असेल तसं होईल आणि जे होईल ते स्वीकारून पुढे जाऊ.. हा असा असतो अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं शोधण्याचा सोस.. बऱ्याचदा चालूनही जातो खेळ.. पण कधी बिघडलाच तर दोष द्यायला नियती असतेच की सोईला.. पण यामुळेच माणसाला सवय लागते मिळेल ते स्वीकारायची.. यातूनच पुढे आपण स्वतःलाच हरवत जातो.. आपलं स्वत्व हरपत जातं.. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय आपण घेतले पाहिजेत.. आपल्या निर्णयांची जबाबदारी घेता यायला पाहिजेत तर जगण्याला काहीतरी अर्थ आहे.. नाहीतर प्रवाहासंगे तर सर्वच वाहत असतात.. त्यात आपण वेगळे ते काय.. होऊन होऊन होईल काय? होतील चुका होऊ देत ना.. असं तरी कुठं आपण वेगळं काही करणार आहोत.. आलोय जन्माला.. जगलो आणि मग राख झाली असंच तर जगणार आहोत.. मग करूयात की कधीतरी हिंमत.. चुकवू यात की कधीतरी किंमत.. मनासारखं जगण्याचा अट्टाहास नसेल ना तर आपलं जगणं फक्त एक सोपस्कार म्हणून राहून जातो.. आपण तो पुर्ण करतो एवढंच काय ते आपलं कर्तृत्व.. म्हणून तर चौकटीत राहून काही होत नसतं.. कधीतरी जमलं पाहिजे ही चौकट मोडायला.. सुरक्षिततेचा उंबरठा ओलांडून मन मानेल ती दिशा धुंडाळायला.. कधीतरी जमलं पाहिजे नियतीच्या हातातील बाहुलं बनून जगण्यापेक्षा स्वत्व जपायला.. स्वतःचा रस्ता शोधायला.. मोकळा श्वास घ्यायला...
© निरंजन 🌱
👌👌कडवं वास्तव....👍👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाआणि आपल्या चौकट तोडण्यामुळे आपली माणसं (ज्यांना फक्त आपणच आपलं समजतो ते नाही) ती दुखावली जाणार असतील तर?
उत्तर द्याहटवाकाय निर्णय घ्यायला हवा समजत नसेल तर?
लोकांच्या म्हणण्यानुसार जर आता सगळ्याच गोष्टींना उशीर झालाय असं असेल तर?